ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. मागील चोवीस तासात 3870 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 1591 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 65 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहचली असून सध्या 60 हजार 147 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 6170 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 170 रुग्णांची नोंद काल करण्यात आली. तर कालच्या दिवसात 101 जणांनी आपला जीव गमावला. त्यामध्ये मुंबईतील 41, ठाणे मनपा 29, नाशिक 7, अहमदनगर 1, औरंगाबाद 14, लातूर 1, अकोला 4, अमरावती 1, बुलढाणा 1, वाशिम 1 आणि पुण्यातील 14 जणांचा समावेश आहे.
राज्यात असलेल्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने मांडले आहे. तर उर्वरित 4 टक्के रुग्ण गंभीर असून 11 टक्के रुग्ण लक्षणे आहेत. यात 65 टक्के पुरुष असून 35 टक्के महिला रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक टक्क्याने कमी झाले असून ते 49.78 टक्के इतके आहे. तर मृत्युदर 4.67 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 66 हजार 49 लोक होम क्वारंटाईनमध्ये तर, 26 हजार 278 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.