ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या 597 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 915 वर पोहचली आहे. तर कालच्या दिवसात 205 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 1 हजार 593 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट द्वारे दिली.
ते म्हणाले, गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 32 जणांनी आपला जीव गमावला असून आत्तापर्यंत 432 जण मृत्युमुखी पडले आहेत. काल मृत पावलेल्या 32 रुग्णांपैकी 26 जण मुंबईचे, पुण्यातील 3, तर सोलापूर, औरंगाबाद आणि पनवेल शहरातील प्रत्येकी एक आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 25 पुरुष आणि 7 महिला आहेत. यातील 17 जण 60 वर्षांपुढील आहेत.
राज्यात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एक लाख 37 हजार 159 नमुन्यांपैकी 1 लाख 26 हजार 376 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर 9 हजार 915 जन पॉझिटिव्ह आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 62 हजार 860 लोक होम क्वारंटाईन असून 10 हजार 810 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
काल एका दिवसात एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे 475 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण संख्या 6 हजार 644 वर पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 26 जणांनी आपला जीव गमावला आहे त्यामुळे मुंबईतील मृतांची एकूण संख्या 270 वर पोहचली आहे.