ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात लाँकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 81 हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या 159 घटना घडल्या असून या प्रकरणात 535 व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट द्वारे दिली.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत कलम 188 नुसार 81 हजार 63 गुन्हे नोंद झाले असून 16 हजार 548 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 85 लाख 50 हजार 394 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1107 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 49 हजार 113 वाहने जप्त करण्यात आली तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.