ऑनलाईन टीम / चंदीगढ :
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने सर्व आमदारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला असतानाच पंजाब सरकारने आमदारांच्या पेन्शनवर टाच आणली आहे. पंजाबमधील आजी-माजी आमदारांना आता केवळ एका टर्मसाठीच पेन्शन मिळणार आहे. तसेच या आमदारांच्या कुटुंबीयांच्या भत्त्यातही कपात केली जाणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे.
पंजाबची आर्थिक स्थिती बिकट आहे. पंजाबवर 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापूर्वीच सरकारने केंद्राकडे दोन वर्षांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली आहे. पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान, आमदारांच्या पेन्शन योजनेचाही सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता. हा भार कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 4-5 वेळा आमदार झालेले किंवा ज्यांना काही कारणास्तव तिकीट मिळाले नाही अथवा पराभूत झाले अशा आमदारांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते. काहींना 3.5 लाख, काहींना 4.5 लाख तर काहींना सव्वा पाच लाख रुपयांची पेन्शन मिळते. काही खासदार आहेत, जे पूर्वी आमदार होते. तेही आमदारकीची पेन्शन घेत आहेत. त्यामुळे सरकारने आमदारांच्या पेन्शनसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता कितीही वेळा आमदार झाला तरी देखील आमदारकीची पेन्शन ही एका टर्मचीच मिळणार आहे, असे मान यांनी म्हटले आहे.