ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 1495 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25 हजार 922 वर पोहचली आहे. तर 422 रुग्ण बरे झाले असून राज्यात आता पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 547 आहे, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
मागील चोवीस तासात राज्यात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 33 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. या 54 पैकी 29 जणांचे वय 60 पेक्षा अधिक होते. तर 21 जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. चार जण चाळीस वर्षाखालील होते. तर कोरोनोमुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता 995 इतकी झाली आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 लाख 30 हजार 857 नमुन्यांपैकी 2 लाख 3 हजार 439 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 25 हजार 922 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14 हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.