ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे.
पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे.
दरम्यान, मुंबईतही तापमानाचा पारा घसरला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.
तर नाशिकमध्ये 11.1डिग्री, परभणी 10.6, परभणी कृषी विद्यापीठ 8.8, जळगाव 12.6, सांताक्रुझ 18.8, बारामती 11.9, औरंगाबाद 13.0, गोंदिया 10.5 आणि नागपूरमध्ये 12.4 डिग्री एवढे किमान तापमान नोंदविण्यात आले आहे.