ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या महाराष्ट्रात लॉक डाऊनच्या काळात दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात येत आहेत.
राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. 9 जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले सर्व नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा 5 अंतर्गत यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
तसेच सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे दिसल्यास प्रशासन संबंधित दुकान, मार्केट बंद करेल. दरम्यान, मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.