- राज्य सरकारकडून शाळा प्रवेशाचे वय शिथिल
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षाच्या बालकास प्ले ग्रुप / नर्सरीमध्ये आणि साडेपाच वर्षाच्या बालकास इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून केली जाणार असल्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काल दिले.
ज्या मुलांच्या वयास 31 डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून किंवा त्यानंतर प्ले ग्रुप किंवा नर्सरी मध्ये प्रवेश घेता येईल. म्हणजेच अडीच वर्षाच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल. या वयाच्या मुलास 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांना जून किंवा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जाईल.
दरम्यान, राज्यातील सीबीएससी, आयसीएसई, आय बी मंडळाच्या शाळांमध्ये काहीवेळा उल्लंघन केले जात होते. त्यामुळे सर्व शाळांमधील प्रवेशांच्या नियमात समानता यावी यासाठी सरकारने सुधारित आदेश काढले आहेत. त्यामुळे मुलाला आता वयाच्या अडीचाव्या वर्षी प्ले ग्रुप किंवा नर्सरीत आणि साडेपाचाव्या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळणार आहे.