ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील आठवड्यात पावसाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने 30 जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 29 जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या अंतर्गत रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पूरग्रस्त जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.