मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येते असली तरी डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील नियम संपूर्ण राज्यात सोमवारपासून लागू होणार आहेत. राज्यातील कोणताही जिल्हा तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहे.
राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण विचारात घेऊन सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार, या प्रत्येक गटानुसार निर्बंध अधिकाधिक कठोर होत गेले. मात्र, आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.
आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दोन आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
नवीन नियम असे आहेत :
अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील. तसेच इतर दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील. पण शनिवार-रविवारी पूर्णपण बंद असतील.
मॉल, चित्रपटगृह बंद तर हॉटेल्सना दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी, परंतु शनिवार-रविवार बंद.
जीम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे.
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.
मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे तसेच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे.
गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे.
लग्नाच्या हॉलला ५० टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल १०० लोकांची उपस्थितीत राहण्यास परवानगी असेल. तर अंत्यसंस्कार विधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल्ससारख्या गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकं नेमून तपासणी करावी. प्रत्येक नागरिकांकडून नियमांचे पालन सक्तीनं करा.
सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.
सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी तर खासगी कार्यालयांना परवानगी मिळाल्यास ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी देण्यात आली आहे.