ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संचारबंदी आणि कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतरही कोरोनाचा ग्राफ खाली आलेला नसून दैनंदिन आकडे धडकी भरवणारे ठरले आहेत.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 54 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली असून काल कोरोनामुळे 568 जणांनी आपला जीव गमावला आहे.
गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचली आहे. त्यातील 32,68, 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.15 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.54 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 95 हजार 747 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 46 लाख 14 हजार 480 नमुन्यांपैकी 16.36 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 39 लाख 15 हजार 292 क्वारंटाईनमध्ये असून, 28 हजार 384 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.