प्रतिनिधी / पंढरपूर
भारतीय जनता पक्षाकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या ठिकाणी ईडी, आयकर विभागाचा छापा टाकला जात आहे. काही लोकं टोकाची भाषा वापरून व काही यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दूषित करण्याचे काम करत असल्याचा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केला.
पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद कार्यक्रम तनपुरे महाराज मठात आयोजिला होता. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सक्षणा सलगर, बळीराम साठे, उमेश पाटील, पक्ष निरीक्षक घुले, सुप्रिया गुंड, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, नागेश फाटे, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, विजयसिंह देशमुख, सुधीर भोसले आदी पदाधिकारी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे मंत्री पाटील म्हणाले, की विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांची व्यक्तिगत माहिती खोलात जाऊन काढणे ही पद्धत देशात रूढ नव्हती. अशी अनेक उदाहरणं जनतेसमोर आली आहेत. भाजपकडून महाराष्ट्रात यंत्रणेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचे काम केले जात असल्याचे जनतेच्या सुद्धा लक्षात आले आहे. कोरोना काळातील परिस्थिती महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे विरोधकांनीसुद्धा मान्य केले आहे. केंद्र सरकारच्या यादीत महाराष्ट्र वरच्या यादीत आहे. विकास वाढीचा वेग वाढवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीचा पराभव धुवून काढा
जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या निवडणुका लागणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव धुवून काढायचा असेल तर पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदमध्ये उमेदवार सक्षमपणे निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.