ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वसामान्यांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्रात रिक्षा निवृत्तीचे वय 20 वरून 15 वर्ष केले आहे. त्यामुळे 15 वर्षांवरील रिक्षा आता भंगारात काढाव्या लागणार आहेत.
1 ऑगस्ट 2021 पासून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल. उर्वरित महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 2024 पासून हा निर्णय लागू होणार आहे. 2013 पूर्वी राज्यात टॅक्सींसाठी वयोमर्यादेचे बंधन घालण्यात आले असले तरी रिक्षांसाठी मात्र बंधन नव्हते.
रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुचवणे, रिक्षाचे निवृत्तीचे वय काय असावे, याबाबत अभ्यास करून अहवाल देण्याबाबत राज्य परिवहन प्राधिकरणाने माजी सनदी अधिकारी बी. सी. खाटुआ यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार प्राधिकरणाने रिक्षाच्या वयोमर्यादेचा निर्णय घेतला.