ऑनलाईन टीम
राज्यामध्ये सध्या टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे काही भागामध्ये जनजीवन काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले आहे. तर ज्या जिल्ह्यात बाधितांची संख्या अधिक आहे याठिकाणचे निर्बंध कायम आहेत. आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात एकूण १० हजार ६९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण बाधितांची संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० इतकी झाली आहे. तर, यातले ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४८ टक्के इतका झाला आहे.
आजची रुग्ण संख्या पाहता त्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १४ हजार ९१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्ताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, गेल्या २४ तासांत राज्यात ३६० मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात १ लाख ८ हजार ३३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या घटकांवरून निर्बंध कमी किंवा जास्त याविषयी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट कमी होणं ही महत्त्वाची बाब आहे.