ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात मागील 24 तासात 1089 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 वर पोहचली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात 37 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 731 एवढी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली.
टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी नव्या 1089 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 37 जण दगावले आहेत. मृतांमध्ये मुंबईचे 25 तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.
3470 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 19,063 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 531 जण होम क्वारंटाईन असून, 13 हजार 494 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.