ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात सोमवारी ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात ३० हजार १०८ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल २३६१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, राज्यात सध्या ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून, सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात सोमवारी ७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण- डोंबिवली ४ , नाशिक- ६ , पुणे ९, सोलापूर २, उस्मानाबाद १आणि यवतमाळमधील एका रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये ४५ पुरुष आणि ३१ महिला आहेत.