ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात शुक्रवारी १४७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.
राज्यात सध्या ५ लाख ४५ हजार ९४७ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात काल दिवसभरात १३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ७५ पुरुष आणि ६४ महिला रुग्णांचा समावेश आहे. ७८ रुग्ण ६० वर्षावरील आहेत. तर ४० ते ५९ वयोगटातील 53 तर ४० वर्षाखालील ८ रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.