ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्रानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीनेही भारत बयोटेकने तयार केलेली ‘कोवॅक्सिन’ ची कमी झाली असल्याचा दावा केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, राजधानी दिल्लीत ‘कोवॅक्सिन’ चा साठा संपला आहे. त्यामुळे आम्हाला दिल्लीतील ‘कोवॅक्सिन’ची सेंटर बंद करावी लागत आहेत.
पुढे ते म्हणाले, भारत बायोटेककडून असे उत्तर देण्यात आले आहे की, केंद्राकडून देण्यात आलेल्या निर्देशामुळे इतर ठिकाणी लस उपलब्ध करता येणार नाही. खरे तर भारत बायोटेकने मंगळवारी अशा राज्यांची यादी जाहीर केली होती ज्यांना केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय लस दिली जाणार होती. त्यामध्ये दिल्लीचे देखील नाव होते.
सिसोदिया यांनी सांगितले की, ‘कोवॅक्सिन’ (भारत बायोटेक) ने काल चिठ्ठी लिहून सांगितले की, लस उपलब्ध नसल्याने आम्ही लस देऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून राज्यांना लस दिली जात आहे. पुढे त्यांनी सांगितले की, जेवढे केंद्राने सांगितले आहे, त्यापेक्षा जास्त लस देता येणार नाही.
पुढे सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींंची मागणी केली होती. यामध्ये 67 लाख ‘कोवॅक्सिन’ आणि 67 लाख ‘कोविशिल्ड’ची मागणी केली होती. मात्र ‘कोवॅक्सिन’ ने काल चिठ्ठी पाठवून सांगितले की, ते लसीचा पुरवठा नाही करु शकत. आमच्याकडील लसीचा साठा संपला आहे. दरम्यान, आम्हाला दिल्लीतील ‘कोवॅक्सिन’चे सेंटर बंद करावे लागेल आहेत, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.
- भारत बयोटेककडून मंगळवारी जारी करण्यात आलेली यादी