मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राने केंद्राचे तिन्ही कृषी कायदे बाजूला सारून महाराष्ट्राचा स्वतंत्र असा कृषी कायदा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीतील नेते दिल्लीत तिन्ही कायद्याला विरोध करतात, पण महाराष्ट्राच्या विधीमंडळात मात्र तेच कृषी कायदे दुरूस्तीसाठी आणतात ही भूमिका योग्य नसल्याचेही ते म्हणाले. या तिन्ही कृषी कायद्याला विरोध करण्यासाठीच आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो असल्याचाही माहिती राजू शेट्टी यांनी दिली. महाराष्ट्राने वेगळा कायदा करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी मांडली.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करताना दिल्लीत शेतकऱ्यांनी गेल्या आठ महिन्यांपासून विरोध केला आहे. येत्या २५ तारखेला या आंदोलनाला आठ महिने पूर्ण होतील. पण केंद्र सरकार मात्र असंवेदनशील आहे. म्हणूनच या आंदोलनाकडे आणि शेतकऱ्यांच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष नसल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.