मुंबई /प्रतिनिधी
राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज हजारो रुग्णांची भर पडत असल्याने, आरोग्ययंत्रणा डळमळीत झाली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी करोनाबाधिता रूग्णांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकारकडे मदत देखील मागितली जात आहे. तर, या मुद्यावरून अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
दरम्यान, आता केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला करण्यात आला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान शुक्रवारी पंतप्रधानांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्याविषयी चिंता व्यक्त केली होती. यावेळी पंतप्रधानांनी ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे राज्यांना ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला आहे.
“महाराष्ट्राला सर्वाधिक १,७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.” अशी माहिती ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.