ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच देशासह राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लसी, बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राला 80 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. अशा परिस्थितीत गुजरातच्या मुख्यालयात तर रेमडेसिवीर मोफत वाटले जात आहे. तिथल्या वृत्तपत्रांमध्ये त्याची जाहीरातही केली जात आहे. जर तिथल्या एखाद्या राजकीय पक्षाला ते मिळू शकते, पण महाराष्ट्राला मिळत नाही, ही एक गंभीर बाब आहे, असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा. आज महाराष्ट्राला एक-एक पैशाची गरज आहे. आणि एका-एका रेमडेसिवीरची गरज आहे. केंद्र ही सर्वोच्च संस्था आहे लोकशाहीची, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेसंदर्भात आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मी प्रियंका गांधी यांच्याशी सहमत आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले. ते देशाच्या मनातील आहेत. आम्हाला मारुन तुम्ही दुसऱ्या देशांवर उदारता दाखवत आहात, हे बरोबर नाही.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी परवाच्या भाषणात सांगितले की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कमी पडणार नाहीत. मग महाराष्ट्रालाच का कमी पाडल्या जात आहेत? हा वारंवार प्रश्न निर्माण होत आहे. पंतप्रधानांच्या मनात किंवा केंद्र सरकारच्या मनात तसे काही नसेल, मग कोणी राजकीय शुक्राचार्य आहेत का? जे महाराष्ट्राशी वैर घेऊन, महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. निदान अशा संकटाच्या प्रसंगी तरी वैर घेऊन अशा प्रकारचे राजकारण करु नये, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.