पुणे / प्रतिनिधी
पुण्यातील गहुंजे मैदानात मंगळवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरूद्ध ओडिसा यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यात ओडिसाच्या शंतनू मिश्रा आणि राजेश धुपेर यांच्या नाबाद अर्धशतकांमुळे ओडिसाचा डाव सावरला गेला. या दोघांच्या खेळीमुळे आजच्या पहिल्या दिवस अखेर ओडिसाच्या 5 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली. तर महाराष्ट्रकडून अक्षय पालकरने 2 व मनोज इंगळे आणि सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
महाराष्ट्राने नणेफेक जिंकत ओडिसाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शंतनू मिश्रा आणि अनुराग सारंगी यांनी ओडिसाच्या डावाची चांगली सुरुवात केली. धावफलकावर 62 धावा झाल्या असताना सत्यजितने अनुरागला पायचीत करत महाराष्ट्राला पहिले यश मिळवून दिले. अनुरागने 87 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर ओडिसाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाल्याचे चित्र दिसत होते. 48.3 षटकांत ओडिसाचे 96 धावांत 5 गडी बाद झाले होते. परंतु, एकबाजू शंतनूने लावून धरली. तर दुसऱया बाजूला मैदानात उतरलेल्या राजेश धुपेर याने चांगली साथ देत ओडिसाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी सुरुवातीला संयमी खेळ करत पडझड रोखली. त्यानंतर यांनी नाबाद शतकी भागीदारी रचत ओडिसाचा डाव सावरला. त्यांच्या खेळीमुळे आजच्या दिवसअखेर ओडिसाने 5 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली आहे. यात शंतनू मिश्रा 265 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 84, तर राजेश धुपेर 104 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांवर खेळत आहेत. खेळात पुन्हा कमबॅक करायचे असल्यास महाराष्ट्राला उद्या सकाळच्या सत्रात ओडिसा संघाला कमीत कमी धावांत बाद करावे लागेल.