तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महाराष्ट्रातील मुंबई देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. याच महाराष्ट्र, मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करून गुजरातची व्यवस्था अधिक वाढवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जात असल्याची घाणाघाती टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सोलापूर शहर जिल्ह्याला भेट देत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणते उपायोजना खबरदारी घेत आहे याचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.
आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईमध्ये होणार होते मात्र हे केंद्र आता गुजरातला हलविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भाजप सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. या प्रश्नावर जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे सेंटर मुंबईतच ठेवा असे तत्कालीन मुख्यमंत्री यांना व विधानसभेत हा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र हे केंद्र गुजरातला हलवण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप सरकार मुंबईसह महाराष्ट्राचे आर्थिक महत्व कमी करण्याचा डाव करीत असल्याचे पाटील म्हणाले. महाराष्ट्रसह मुंबईचे महत्त्व कमी करून त्यांची व्यवस्था कमजोर करीत गुजरातची व्यवस्था अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकार, तत्कालीन सरकारने याला साथ दिली आम्ही त्याचा विरोध.
महाराष्ट्राला लक्षात आले की, मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या अहिताचे निर्णय या भाजप सरकारने घेतले असल्याचेही जलसंपदामंत्री पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे काम गतीने
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. त्यामुळे आता अधिक कठोर योजना व उपयोजना करण्याची आवश्यकता आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे काम अधिक गतीने सुरू आहे. स्वॅप टेस्ट, केस पेपर तसेच चाचण्या लवकर होत आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. चांगले गतीने काम केल्यास पंधरा दिवसात अजून रुग्ण बरे होतील.
अजून काय म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील
- सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करण्यासाठी अधिक कठोर निर्णय, योजना घेण्याची गरज
- अधिक वेगाने कंटेनमेंट झोन, आयसोलेशनचे काम गतीने होणे गरजेचे
– सोलापुरात 124 पॉझिटिव्ह रुग्ण , 6 मृत तर 19 व्यक्ती बरे होऊन घरी गेले - रविवारी नव्याने 10 रुग्ण वाढले
- भाजप सरकारने मागील पाच वर्षात महाराष्ट्राच्या अहिताचे निर्णय घेतले