वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निवडीचा विषय तब्बल महिन्याभरापासून रखडल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांनी या बदलासाठी निवडलेल्या कार्यपद्धतीबद्दलही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी खाजगीत बोलताना नापसंती दर्शवली आहे. 3 जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत आले होते. पक्षश्रेष्ठींना राज्यात बदल करायचा असल्यास आपण स्वतःहून राजीनामा देण्यास तयार आहोत असे त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती.
हायकमांडची पसंती नाना पटोलेंना
त्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांनी मुंबईत दाखल होऊन मंत्री आणि आमदारांची मत जाणून घेतली होती. या चर्चेत विधानसभेचे सभापती नाना पटोले, राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक राजीव सातव, मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी विचारात होती. या सर्व चर्चेत काँग्रेसच्या हायकमांडचा कल सभापती नाना पटोले यांच्या बाजूने होता. असे असले तरी राज्यात अनेक मंत्री सरकारच्या स्थिरतेसाठी तूर्तास विधानसभा अध्यक्ष बदलण्याच्या विरोधात होते. तरीही दिल्लीतून नाना पटोले यांच्या नावावरच निश्चिती झाली होती. फक्त अधिकृत घोषणा बाकी होती. मात्र या निश्चितीला दोन आठवडे उलटल्यानंतर ही नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने संभ्रम कायम आहे.
बदल रखडल्याने थोरातही नाराजी
मुंबई आणि दिल्लीतही मंत्र्यांसोबत तास-तास बैठका करूनही हा प्रश्न रखडला आहे. तीन पक्षांचे सरकार असताना विधानसभा अध्यक्षांच्या बदलाचा प्रश्न प्रगल्भतेने हाताळला जाणे अपेक्षित होते. याचे संकेत ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते. त्यामुळे ना धड सध्याच्या प्रदेशाध्यक्षांना काम करता येत आहे, ना नव्या अध्यक्षाला काही स्पष्टपणे कळतय. संघटनेत संभ्रम असल्याची स्थिती आहे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.