बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. दरम्यान कर्नाटक सरकारने केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जास्त खबरदारी घेतली आहे. सरकारने राज्याला जोडणाऱ्या सीमेवर तपासणी नाके सुरु केले आहे. तसेच काही दिवसांअगोदर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेश बंद केल्याचे समोर आले होते. कर्नाटकात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र व केरळमधील करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येची कर्नाटक सरकारने एक प्रकारे धास्ती घेतल्याचं यावरून दिसत होतं. कर्नाटक सरकारने राज्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातलेले आहेत. दरम्यान, आज(शुक्रवार) कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्म सावदी यांनी राज्याची भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र व केरळमधून कर्नाटकात प्रवेश करणारी कोणती बस थांबवली जाणार नाही, असं म्हंटल आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी कर्नाटक-केरळ सीमेवरील निर्बंधाबद्दल केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत नियमात शिथिलता देण्याची मागणी केली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनीराज्यात कोणताही गोंधळ नाही आणि कोणालाही राज्यात प्रवेश करण्यास कोणतेही बंधन नाही, असे म्हंटले होते.
परंतु मंत्री सुधाकर यांनी केरळ व महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य असल्याचे म्हटले. पण राज्यात कोणालाही प्रवेश करण्यास कोणतेही बंधन नाही. यात कोणताही गोंधळ नाही. जास्त प्रकरणे असल्याने केवळ त्या दोन राज्यांसाठीच निर्बंध घालण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
कर्नाटकाचे परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी महाराष्ट्र व केरळमधून कर्नाटकात प्रवेश करणारी कोणती बस थांबवली जाणार नाही. मात्र, प्रवाशांना कोविड-१९ निगेटिव्ह प्रमाणपत्राची गरज असेल आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल, असं यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ७२ तासांच्या आतील करोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात असल्याचेही समोर आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रवाशांची तपासणी केली जात आहे. करोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची खात्री करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. तर, पॉझिटिव्ह आढळलेल्यांना परत पाठवले जात आहे.
कोरोना प्रसाराचा धोका टाळण्यासाठी चेक पोस्टवर प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग आणि मास्कची देखील तपासणी केली जात आहे. सागली जिल्हा लगतच्या कर्नाटकच्या सीमेवरील कागवाड या ठिकाणी देखील कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रासह कोरोनाचं संक्रमण वाढलेल्या राज्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्रानं तीन सदस्यीय पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश केलेला असून, ही पथकं राज्यांना करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचं नेतृत्व करणार असून, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि जम्मू व काश्मीरमध्ये विशेष लक्ष देणार आहेत, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.