देवदास मुळे / सातारा :
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा कोण पटकावणार याकडे संपूर्ण राज्याचे तसेच देशाच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधलेले असते. गदेचा इतिहास पुराणापासून आहे. महाभारत, रामायणातही भीम, हनुमानाचे शस्त्र गदा हेच होते. गदा हे ताकदीचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. असा तेजस्वी इतिहास महाराष्ट्र केसरीच्या गदेला लाभलाय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1961 पासून सुरू झाल्या, तेव्हापासून महाराष्ट्र केसरी मल्लाला ही गदा दिली जाते.
यावर्षी एप्रिलच्या कडक उन्हाळय़ात या स्पर्धा रंगत असल्या तरी दरवर्षी जानेवारी महिन्यात या स्पर्धेचे वेध लागतात. त्यावेळीच या स्पर्धा होतात. महाराष्ट्र केसरीच्या गदेचे मोठे आकर्षण लाल मातीत घाम गाळणाऱया मल्लांना असते. राज्य कुस्तीगीर परिषदेने 1961 पासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यास प्रारंभ केला, तेव्हापासून विजेत्या मल्लास ही गदा दिली जाते. या गदेची उंची साधारणत: 27 ते 30 इंच असते. व्यास 9 ते 10 इंच असतो. वजन 8 ते 10 किलोपर्यंत असते. गदा लाकडी असून त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. गदेसाठी सुमारे 2 किलो चांदी लागते. चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ व कुस्तीचे दैवत असणाऱया हनुमानाचे चित्र गदेवर असते. महाराष्ट्र केसरीच्या गदेप्रमाणेच गावोगाव भरणाऱया कुस्त्यांच्या मैदानातही विजयी मल्लाला गदा देण्याची परंपरा सुरू झाली, याची प्रेरणा महाराष्ट्र केसरीच्या गदेचीच आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे 1961 पासून 1982 पर्यंत ही गदा अजिंक्य मल्लास देण्यात येत होती. 1983 साली कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे सुपूत्र, माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामासाहेबांच्या स्मरणार्थ अजिंक्य मल्लास गदा देण्याची परंपरा सुरू केली. पुण्यात 1983 साली पहिली गदा अशोक मोहोळ यांनी दिली. तेव्हापासून आजपर्यंत सलग 38 वर्षे मोहोळ कुटुंबीय ही गदा देत आहेत. दरवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झाली की ते गदा बनवण्यास प्रारंभ करतात. ही गदा बनवण्याचे परंपरागत काम पुणे येथील पानगरी कुटुंबीय करतात. विशेष म्हणजे कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरीसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन मोहोळ कुटुंबाने ही परंपरा श्रद्धापूर्वक जपली आहे. दरवर्षी मोहोळ कुटुंबीय ही गदा घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी येत असतात. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ ही गदा विजेत्या मल्लास प्रदान केली जाते. zदरवर्षी महाराष्ट्र केसरीत उतरणाऱया शेकडो मल्लांना या गदेचे आकर्षण असते. त्यासाठी जीवतोड मेहनत मल्ल घेत असतात. मात्र दरवर्षी एकच मल्ल ही गदा जिंकतो. यावरून या स्पर्धेचे महत्व लक्षात येते. गेल्या काही वर्षात स्पर्धेतील उपविजेत्या मल्लास उपमहाराष्ट्र केसरीची गदा देण्यात येत आहे.