वार्ताहर / उचगांव
वळिवडे गावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने सुरु असणारा पाणी पुरवठा सुरळित नसल्या कारणाने येथील सरपंच अनिल पंढरे आणि इतर तीन सदस्य यांनी सोमवारपासून नियोजित केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी हे काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केले आहे. याबाबतची माहिती अशी की, येथील पाणीपुरवठा सुरळित नसल्यामुळे सरपंच अनिल पंढरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पोर्टलव्दारे तक्रार केली होती.
त्यानंतर सरपंच पंढरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी वळिवडे येथे येऊन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. येथील पाईपलाईनचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करुन गावातील टाकीमध्ये पाणी देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे हे उपोषण स्थगित करत असल्याचे सरपंच पंढरे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. डी. चौगुले, शाखा अभियंता एन. बी. लोकरे, घेवडे, सी. जी. नरके, एन. डी. जांभळे. एन. एस. वनमराठे, कंत्राटदार संतोष गंडगे, ग्रामपंचायत सदस्य भगवान पळसे, संजय चौगुले, योगेश खांडेकर आदि उपस्थित होते.