कोरोनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती, दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!
जनतेला गर्दी न करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / मुंबई
राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर कोरोनाची दुसरी लाट आली तर ती त्सुनामी ठरू शकते, अशी भीती व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन केले.
अन्य राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी
अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. दिल्लीत गंभीर स्थिती आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील, याची जाणीव ठाकरे यांनी करून दिली.
उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सरकारने आज, सोमवातपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा, अंतर नियम पाळा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचे आवाहन केले.
उगाच विषाची परीक्षा घेऊ नका
आतापर्यंत जो संयम दाखवला आहे तसाच तुम्हाला यापुढे दाखवायचा आहे. आपल्या हातात सध्या खबरदारी घेण्यापलीकडे काहीच नाही. लस अद्याप आलेली नाही. त्याबाबत निश्चित कुणीच काही सांगत नाही. लस आली तरी पुढची प्रक्रिया मोठी आहे. लगेचच राज्यातील साडेबारा कोटी लोकांना लस देता येणार नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता तुम्हाला अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. आपण आज एका नाजूक वळणावर आहोत. या वळणावरून आपल्याला सहीसलामत पुढे जायचे आहे. कोरोनाचे आकडे जे कमी झाले आहेत ते पुन्हा वाढू द्यायचे नाहीत. देशातील काही शहरांत रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. तसे आपल्याला काही करायचे नाही. लॉकडाऊनही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर तुमची साथ महत्त्वाची आहे. कृपा करून गर्दी टाळा. जे नियम ठरवले आहेत ते पाळा. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी जनतेला केली.
कोरोनावर लस येणार येणार असे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप ती आलेली नाही. त्यामुळे लस आल्यानंतर ती कशी द्यायची हे अद्याप अधांतरीच आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. समजा ही लस डिसेंबरमध्ये आली तर महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेला ही लस द्यावी लागणार आहे. पण ही लस बनवणाऱ्या ज्या दोन-चार कंपन्या आहेत, त्यांच्याकडून पहिला डोस त्यानंतर बुस्टर डोस द्यावे लागणार आहेत. म्हणजेच साडेबारा दुणे 25 कोटी जनतेला ही लस द्यावी लागणार आहे. अशा प्रकारे पहिल्या डोसपासून शेवटच्या डोसपर्यंत किती काळ जाईल हे अद्याप सांगता येणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
यावेळी ठाकरे यांनी हे उघडा ते सुरू करा अशी मागणी करणाया भाजप आणि मनसेवरही निशाणा साधला. सरकार जनतेची काळजी घेत आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक करावा लागत आहे. जर कोरोना वाढला तर मागणी करणारे जनतेची जबाबदारी घेतील काय? असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले….
गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर वाढणार आहे, हे पक्के ध्यानात असू द्या
पोस्ट कोविडचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच बाहेर पडा
महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे. जनतेने आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे