ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राच्या बारावी बोर्डाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर आज आपत्ती व व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत.
त्यानंतर आज या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असेही वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर याआधीच राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.