- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑनलाईन टीम / मुंबई :
सरकारने मंदिरे सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखून भाविकांसाठी मंदिरे खुली करावीत असे सांगून, ह्या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केला आहे.
महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा प्रश्न विचारला आहे.
राज ठाकरे पत्रात पुढे म्हणतात, कोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते, तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही देखील समर्थन केले होते पण आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना केवळ महाराष्ट्रातच देवळे का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या.
लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपाळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे, सरकारच्या आदेशांचं अत्यंत समजूतदारपणाने पालन केलं आहे त्यामुळे उद्या मंदिर उघडली तर ह्या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल ह्याची मला खात्री आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.