गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱयांना कोरोना चाचणी अहवाल केला सक्तीचा
प्रतिनिधी / पणजी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱयांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सक्तीचा केल्याने अनेकांचे विवाह सोहळे देखील अडचणीत आले आहेत. केवळ गोव्यातील माणसेच अडचणीत आलेली आहेत असे नव्हे तर गोव्यात विविध व्यवसायासाठी महाराष्ट्रातून येणारी मंडळी देखील अडचणीत आली आहे.
या दोन राज्यांदरम्यानचे संबंध हे पूर्वापार आहेत. महराष्ट्र व गोवा दरम्यान घरोब्याचे संबंध आहेत. मात्र महाराष्ट्रात शिवसेना नेतृत्वाखालील सरकारची निती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बिघडवली आणि त्यातूनच कोरोना संदर्भात छोटय़ाशा टीचभर गोव्यातून येणाऱया नागरिकांना अडविण्याचे सत्र उद्धव सरकारने सुरू केल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांदरम्यानचे संबंध बरेच ताणले गेले आहेत.
आजपासून राज्यात तुळशी विवाहाला प्रारंभ होतोय. त्यानंतर घराघरातील मुलामुलींच्या लग्न सोहळय़ाला प्रारंभ होतोय. गोव्यातील मुलेमुली महाराष्ट्रातील मुली मुलांबरोबर विवाहाच्या बंधनात अडकणारे आहेत. अनेकांचे विवाहाचे मुहूर्त हे येत्या 3 डिसेंबरपासून सुरु होत आहेत. गोव्यात येण्यासाठी अनेकांनी विमानाच्या टिकीट, काहींनी बसेसच्या टिकीट तर काहीनी कार गाडय़ा बुकींग केलेल्या आहेत. गोव्यात येण्यास गोवा सरकारचे द्वार खुले आहे. मात्र गोव्यातून परत महराष्ट्रात जाणाऱयांची उद्धव ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे गोची झालेली आहे, त्यातून अनेकांचे विवाहसोहळे अडचणीत आलेले आहेत.
केवळ गोमंतकीच असे नव्हे तर महाराष्ट्रातील मंडळी देखील मोठय़ा प्रमाणात अडचणीत आलेली आहेत. गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱयांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जाईल, असे आता कळविण्यात आले आहे. परंतु दररोज नोकरीनिमित्त गोव्यात जाणाऱयांसाठी ही सुविधा केली आहे. जे विवाह सोहळे वा घरगुती कार्यक्रमानिमित्त गोव्यात येतील त्यांची अडचण मात्र वाढवून ठेवली आहे.
महाराष्ट्रच्या आडमुठय़ा धोरणाचा सर्वांना फटका
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने शेजारील महाराष्ट्रात परतणाऱयांसाठीची कोरोना तपासणी सशुल्क केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याने तपासणीसाठी येणारा खर्च प्रत्येक व्यक्तीला करावा लागणार असल्याने गोव्यात येणे महाराष्ट्रातील मंडळींना तसेच मूळ गोमंतकीय असलेल्यांना देखील परवडणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या आडमुठय़ा धोरणाचा फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे.