ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नववी ते बारावीनंतर आता राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील शाळा या बंद राहणार आहेत. या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर शाळा उघडण्यासंबधी प्रस्ताव मांडण्यात आला होता. खबरदारीच्या सर्व उपाययोजना अमलात आणून, 27 जानेवारीपासून शाळा सुरू करा, अशी सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच
मुंबईतील शाळा मात्र पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद होत्या. त्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहतील.
- पुण्यात पालकांशी चर्चा करून घेणार निर्णय
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होण्यास अद्याप वेळ आहे. येत्या काही दिवसांत पुण्यात पालकांशी चर्चा केली जाईल, तसेच शाळांकडून सद्य स्थितीची माहिती घेतली जाईल आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.