18 वर्षांखालील मुलांची काळजी घेण्यात राज्य सरकार प्रयत्नशील
प्रतिनिधी / मुंबई
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास 18 वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून राज्यात तातडीने पेडियाट्रिक टास्क फोर्सची निर्मिती केली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (6 मे) रात्री व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक पेडियाट्रिशन्सशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून या लाटेची तीव्रता कमी करण्यासह आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू नये यासाठी आत्तापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच पहिली आणि दुसरी लाट हाताळताना आढळेल्या त्रुटी, उणीवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून अनेक देशांमध्ये दुसऱया लाटेनंतर तिसरी लाट आली आहे. त्यामुळे राज्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडÎात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर अगोदरच काही महत्वाचे निर्णय घेत आहोत. राज्यात पेडियाट्रिक टास्क फोर्स ताबडतोब तयार करत आहोत, असे टोपे म्हणाले.
सद्यस्थितीत 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र 18 वर्षांपेक्षा कमी वयातील मुला-मुलींचे लसीकरण केले जात नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लागणारे बेड, पेडियाट्रिक व्हेंटिलेटर किंवा जे काही वेगळ्या पद्धतीचे बेड लागतात ते देखील आपल्याला तयार करून ठेवले पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री व्हीसी घेऊन अनेक पेडियाट्रिशन्सशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण या दृष्टीने देखील तयारी करत आहोत, असेही टोपे यांनी सांगितले.