उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे – पवार यांच्या हस्ते कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा
वार्ताहर/ पंढरपूर
महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सारिका भरणे, मानाचे वारकरी कोंडिबा देवराव टोणगे, प्रयागबाई कोंडिबा टोणगे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत असून येणाऱया काळात जगातून कोरोना नाहीसा होवो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना आहे असे सांगून पवार म्हणाले, चीन, रशिया व युरोप देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेतले असले तरी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर केलाच पाहिजे.
तसेच शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे ही एक नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. कोरोना काळात आपल्या जिवाभावाचे अनेक लोक दगावले. या काळात माणसाचा जीव खूप महत्त्वाचा होता तसेच आपली श्रद्धा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहून सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घेतला. तसेच कार्तिकी वारीसही परवानगी दिली. या वषीच्या कार्तिकी वारीस एसटी संपामुळे वारकऱयांची संख्या कमी आहे असे नमूद करून राज्यातील एसटी कर्मचाऱयांच्या संपावर राज्य शासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, शकुंतला नडगिरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विलास राठोड आदी उपस्थित होते.
चौकट 1
मंदिर समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखडय़ासह विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. मंदिर परिसर विकासासाठी केंद्राकडून मदत मिळण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील. तसेच पालखी महामार्गाच्या कामात राज्य शासन केंद्राला सहकार्य करणार आहे.
जातीय सलोखा राखणे ही आपली परंपरा
त्रिपुरा येथील घटनेमुळे राज्यातील मालेगाव, नांदेड व अमरावती येथे काही घटना घडल्या. अशा प्रकारांमुळे पोलिसांवर ताण पडतो. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. जातीय सलोखा राखण्याची आपल्या राज्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.