ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पहाता राज्य सरकारने शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजप सहकार्य करेल. मात्र, सरकारने देखील सर्व सामान्य जनतेला तात्काळ मदत करावी. अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली.
ते म्हणाले, आताची कोरोनाची भयावर परिस्थिती पाहता आमचे सर्व नेते आणि आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल या दृष्टीकोनाने भाजपचे कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी होतील, असा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच सरकारकडून ज्या उपाययोजना केल्या जातील त्या सर्वांना सहकार्य करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असं आम्ही समजतो.
पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या विषयावर आम्ही कधी राजकारण केले नाही. पण आपली अकर्मण्यता लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर टीका करणे बंद केले पाहिजे. आम्ही आधीही सहकार्य केले आणि आताही करू !
मात्र, सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधाची चर्चा करुन चालणार नाही. त्यासोबतच नवीन स्ट्रेन काय आहे? तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच काय वाढतोय? या संदर्भात प्रबोधन केले पाहिजे. मुंबई, पुणे ही महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आहेत. त्याची काळजी घेतली पाहिजेच. पण या दोन शहरांबाहेरही महाराष्ट्र आहे, हे सरकारला लक्षात घ्यावे लागेल. या महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनविण्यावर जोर दिला पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
- सरकारने वीज तोडणी बंद करावी
राज्य सरकारने सक्तीची कारवाई करुन चार ते पाच हजार कोटी वीज ग्राहकांकडून जमवले आहेत. आतातरी राज्य सरकारने वीज कनेक्शन कापणे बंद केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकतो. त्यामुळे वीज कनेक्शन कट करण्याचा निर्णय मागे घ्यावा. सरकारने समाजातील गरीब घटकाचा विचार करावा. त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावा. मध्यमवर्गीयांना जगण्यापूर्तीतरी मदत केली पाहिजे. चर्चा केवळ लॉकडाऊन बाबत न करता या इतरबाबतीतही चर्चा करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असेही फडणवीसांनी या वेळी म्हटले आहे.