ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस टी बस प्रवासासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात आता आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 20 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे.
राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. मात्र, एस टी प्रवासा दरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणं गरजेचं आहे.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.
कोरोनाच्या या महामारीत एसटी लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत धावली. इतकंच नाही तर राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी थेट कोट्यापर्यंत पोहचली. तिथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत धावली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, लॉक डाऊनमुळे 113 दिवसाच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच 2300 कोटींचा महसूल बुडाला आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.