निजामुद्दीन एक्सप्रेसही रद्द, पाऊस, पूरच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मिरज / प्रतिनिधी
दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे मुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस या गाडया २८ जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर, हजरत निजामुद्दीन- वास्को ही गाडी २५ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूरहून तिरूपतीला जाणारी हरिप्रिया एक्सप्रेस मिरजेतून कुर्डवाडी मार्गे वळविण्यात आली.
गेली पाच दिवस दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे बहुतांशी नद्यांना पूर आले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पूराचे पाणी आल्याने दळणवळण ठप्प आहे. बससेवा बंद आहे. या महापूराचा फटका रेल्वे वाहतूकीला बसला आहे.
मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस या गाड्या पुढील चार दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
२८ जुलै रोजी या गाड्या पूरस्थिती पाहून सुरू करण्यात येणार आहेत. तर दक्षिणेतून उत्तरेकडे जाणाऱ्या आठ गाडया मिरज- पुणे आणि मिरज- कुर्डवाडीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही मिरजेतून बेळगावकडे न जाता कुर्डवाडीमार्गे वळविण्यात आली होती.