प्रतिनिधी/ रत्नागिरी
ठाकरे सरकार फडणवीस सरकारचे सगळे प्रकल्प गुंडाळणार, अशी महाविकास आघाडीची चुकीची प्रतिमा विरोधक करत आहेत. आम्ही समृद्धी महामार्ग पूर्ण ताकदीने पुढे नेण्याचं काम करत आहोत. त्यामुळे असे प्रकल्प बंद करण्याचा विषयच येत नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरीत पत्रकार परिषदेवेळी सामंत यांनी हे वक्तव्य केले. नव्याने कुणी हिंदुत्व स्वीकारावं, कोणी कुठचा झेंडा आणावा, हा त्यांचा वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे. पण पक्षाने मतदारांसमोर जावं. निवडणुका लढवाव्यात. यातून आपले खासदार, आमदार, जिल्हा परिषद किती निवडून येतात. याच्यावर सगळं भवितव्य अवलंबून असल्याचा टोला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मनसेला लगावला. निवडणुकीनंतर मनसेच्या अजेंडय़ाचा परिणाम किती झाला, हे सिद्ध होईल आणि निवडणुकीनंतर मनसेला काय ते उत्तर मिळेल, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. पुणे-मुंबई हायपर लूप काम पूर्णपणे थांबवण्यात आले नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ज्या योजनांवर अतिरिक्त खर्च दिसतोय, त्याचा आढावा घेवून पुढे जाण्यासाठी काही कामं थांबवलेली आहेत. त्यामध्येच पुणे-मुंबई हायपर लूप असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्राच्या भिमा-कोरेगाव प्रकरण तपासावर टीका
भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवला आहे. हे प्रकरण अतिशय सेन्सेटिव्ह आहे. मात्र असं असतानाही यामध्ये वेगळं राजकारण करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णत: सक्षम असून ते सक्षमतेने या प्रक्रियेला समोर जातील, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.