प्रतिनिधी / कोल्हापूर
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एकत्र लढायचे आणि निकालानंतर सोनिया गांधी, शरद पवार आमचे नेते असल्याचे सांगून सरकार स्थापन करायचे हे चुकीचे आहे. सोनिया गांधी यांची शपथ घेऊन स्थापन केलेले राज्यात सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार अनैतिक आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. भाजपमध्ये विरोधी पक्षात काम करण्याची ताकद असून, या सरकारमधील मंत्र्यांच्या कारचे टायर झिजण्यापूर्वीच सरकार बदलेल, असे भाकीतही त्यांनी केले.
हॉटेल अयोध्या येथे भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्य सरकार आणि मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, चोरुन, लुटमारी करून सरकार आल्यानंतर राज्यासह जिह्यातील नेत्यांना आता स्वर्ग दोन बोटे उरला नसून ते दोन बोटे स्वर्गात गेले आहेत; पण स्वर्गात असणाऱया हिंदूह्य्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटले असेल? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना लक्षात ठेवेल की नाही याची माहिती नाही; पण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही त्यांची शिकवण आम्ही नेहमी लक्षात ठेवू, असा टोलाही त्यांनी लगावला.
वरीष्ठ पातळीवरील हिशोब पूर्ण करण्याची त्यांना चांगली माहिती
मंत्री सतेज पाटील यांनी शहरातील थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली नाही तर विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली होती. तरीही ते निवडणूक लढले आणि हरले. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत ते जिंकले. आता सरकार स्थापनेमध्ये इतर विधानसभा सदस्यांना मागे टाकून त्यांनी मंत्रीपद मिळवले. त्यांना वरीष्ठ पातळीवरील हिशोब कसे चुकते करायचे, याची माहिती असल्यामुळेच मंत्रीपद मिळाले असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
बंद पडणाऱया स्कुटरवरून फिरणाऱयांकडे साखर कारखाना कोठून आला?
गेल्या पाच वर्षांतील सत्तेच्या कालावधीत एक इंच जमीन अथवा एक ग्रॅम सोनेही खरेदी केले नाही. पण रस्त्यामध्ये चारवेळा बंद पडणाऱया स्कुटरवरून फिरणाऱयांकडे खासगी साखर कारखाना कोठून आला. फाईव्ह स्टार हॉटेल कसे आले? याचा शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रात आमचे सरकार, घाबरण्याचे कारण नाही
काचेच्या घरात राहणाऱयांनी विचार करून आमच्यावर आरोप करावेत. राज्यात नसेल; पण केंद्रात आमचे सरकार आहे. राज्यातील बहुतांशी योजना केंद्राच्याच आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याऐवजी विकासकामे करावीत. रात्रीनंतर दिवस येतो. त्यावेळी मात्र त्यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ येईल, असा दावाही त्यांनी केला.
कोरे, आवाडे, महाडिक आमच्यासोबत ढासळणाऱया घरात राहिले
आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपकडे सत्ता नसतानाही एकनिष्ठ राहिले. एखादे घर ज्यावेळी ढासळायला लागते, त्यावेळी सर्व भिंती ढासळतात; पण असा अवस्थेतही हे तिघे नेते भाजपसोबत राहिल्याबद्दल त्यांचे कौतूक वाटते, असेही पाटील म्हणाले. आगामी काळात गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, महानगरपालिका, बाजारसमिती, शेतकरी संघ आदी निवडणुका भाजपकडून ताकदीने लढविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘त्यांनी’ साथ सोडल्यामुळेच जि.प.मध्ये पराभव
जिल्हा परिषदेच्या गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत भाजपच्या घटक पक्षांनी मांडीला मांडी लावून काम केले. त्यांना विकासकामांसाठी भरघोस निधी दिला. तरीही त्यांनी साथ सोडल्यामुळेच कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव झाला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली