पंढरपूर येथे संतछाया भक्तनिवासाचे भूमिपूजन; महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही
पंढरपूर प्रतिनिधी
सध्या राजकीय हेतूने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्स या संस्थांच्या माध्यमातून कारवाया केल्या जात आहेत. आम्ही कोणीही अशा कारवायांना घाबरणार नाही. तरीही अशा वेळी भावनिक न होता, शांतपणे त्यास प्रत्युत्तर दिले पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही पद्धतीने कारवाया सुरू झाल्यास त्यास लोक सामोरे जातील; परंतु दिल्लीपुढे आम्ही झुकणार नाही, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे संत छाया वारकरी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भगीरथ भालके, बाळराजे पाटील, युवराज पाटील, गणेश पाटील, अभिजित पाटील, नागेश फाटे, कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असा खोचक सल्ला देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिला. तर दुसरीकडे भाजपच्या नादी न लागता जपून पावले टाकावीत, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे.
आ. पवार यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ईडीने कारवाई केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ईडीने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना समजू शकतो. परंतु सर्वच राजकीय नेत्यांनी शब्द मोजून आणि मापून बोलले पाहिजेत.
भाजपने जवळ गेलेल्या नेत्याला व पक्षाला संपवले आहे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जातीय तेढ निर्माण करणारी भाजपची भाषा बोलत आहेत. मात्र, भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला व पक्षाला संपवले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी यापुढच्या काळात जपून पावले टाकावीत, असा सल्लाही आ. पवार यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.