वीजबिलांचा भरणा न झाल्यास स्थिती आणखी गंभीर होणार
प्रतिनिधी / सातारा
जिह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत 247 कोटी 42 लाख रुपयांनी वाढ झाली असून सद्यस्थितीत 5 लाख 30 हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे तब्बल 994 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी आहे. जिह्यातील या अभूतपूर्व थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा हे आर्थिक संकट आणखीनच गडद होत जाणार आहे.
कोरोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत सातारा जिह्यात सर्व वर्गवारीतील 3 लाख 48 हजार वीजग्राहकांकडे 747 कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी होत गेल्याने महावितरणच्या आर्थिक संकटाला सुरवात झाली आहे. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत 1 लाख 75 हजारांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कम देखील तब्बल 98 कोटी 60 लाखांनी वाढली आहे. सद्यस्थितीत सातारा जिह्यात 3 लाख 44 हजार 200 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 121 कोटी 41 लाख रुपयांची तसेच कृषिपंप व इतर अशा 1 लाख 86 हजार ग्राहकांकडे 873 कोटी 9 लाख असे एकूण 5 लाख 30 हजार ग्राहकांकडे 994 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजबिल रिडींगप्रमाणे असल्याचे ग्राहकांना मान्य
वीजग्राहकांना ‘अनलॉक’नंतर मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. यापूर्वी ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम महावितरणकडून दूर करण्यात आला आहे. वीजक्षेत्रातील तज्ञांनी सुद्धा महावितरणने रिडींगप्रमाणे तीन ते चार महिन्यांचे एकत्रित दिलेले वीजबिल अचूक असल्याचा निर्वाळा दिला आहे. महावितरणच्या सर्व विभाग कार्यालयांतर्गत बिलांबाबत हजारो तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व ग्राहकांचे बिलांबाबत शंकानिरसन करण्यात आले आहे. ग्राहकांनी देखील वीजबिल रिडींगप्रमाणे अचूक असल्याचे मान्य केले असले तरी वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे थकबाकीमध्ये मोठी वाढ होत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक आहे.
वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे 80 ते 85 टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. ‘अनलॉक’ मुळे वाणिज्यिक वापर, रब्बी हंगाम व सणासुदीचे दिवस, औद्योगिक उत्पादन आदींमुळे या महिन्यापासून प्रामुख्याने औद्योगिक, वाणिज्यिक व कृषिपंपांच्या वीजमागणी मोठी वाढ होत जाणार आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर उभा ठाकणार आहे.
ग्राहकांनी सहकार्य करावे
कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीच्या प्रतिकूल परिस्थितीत महावितरणकडून अहोरात्र ग्राहकसेवा दिली जात आहे. महावितरणच्या या गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
सातारा जिह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. याशिवाय लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल ऍप किंवा इतर ’ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. यासोबतच ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumeRill/ या लिंकवर उपलब्ध आहे.
जिह्यात थकबाकी
घरगुती 3 लाख 44 हजार 200
वाणिज्यिक व औद्योगिक 121 कोटी 41 लाख
कृषिपंप व इतर 873 कोटी 9 लाख