निसराळे ते नांदगाव रस्त्यालगतच्या झाडांची कटरच्या सहाय्याने बेसुमार कत्तल
देशमुखनगर : महावितरणने सातारा तालुक्यातील निसराळे ते नांदगाव रस्त्यालगतच्या झाडांची बेसुमार कत्तल केली आहे. त्यांना कोणताही कायदा नाही, कोणाचीही परवानगी नाही. बेसुमार वृक्षतोड करून महावितरणने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात ही झाडे पाडली आहेत. महावितरण याबाबत दखल घेताना दिसत नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी स्वाभिमानी संघटनेने याबाबत स्वतः वन विभागाकडे लेखी तक्रार करून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे महावितरणची दादागिरी वाढलेली आहे, ते कुणालाही जुमानत नाहीत आणि आज लाईट बंद करून सर्वत्र वृक्षतोडीचा कार्यक्रम दिवसभर चालू आहे.
वन विभागाने याबाबत गांधारीची भूमिका घेतली आहे. ती सोडून तातडीने कारवाईची पाऊले न उचलल्यास व सदर तोडलेल्या झाडांची मोजदाद करून गुन्हा दाखल न केल्यास सदर कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करून गुन्हे दाखल करण्यास भाग पाडेल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष राजु शेळके यांनी दिला आहे.