आटपाडी / प्रतिनिधी
कोरोना, लॉकडाऊन यामुळे गत वर्षभर ठप्प असलेली थकीत वीज बिल वसुलीला महावितरणने पुन्हा सुरुवात केली आहे. अवघ्या 3 दिवसात आटपाडी उपविभाग कार्यालयाने तब्बल 76 लाखांची वसुली केली. तर 400 कनेक्शन तोडले आहेत.
आटपाडी तालुक्यातील घरगुती वीज कनेक्शनची 4 कोटी 31लाख रुपये थकबाकी आहे. व्यवसायिक कनेक्शनचे 1 कोटी 9 लाख, इंडस्ट्रियलचे 71 लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे तीन कोटी 37 लाख, कृषी पंपाचे 72 कोटी 97 लाख इतकी प्रचंड थकबाकी आहे. कोरोना, विज बिल माफी, शासनाची भूमिका यामुळे गत वर्षभरात वीज बिलांचा भरणा झालाच नाही. आत्ता शासनाने वीज बिल वसुलीचे स्पष्ट निर्देश दिले असून ग्राहकांनी वीज बिलांचा तात्काळ भरणा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे उपअभियंता संजय बालटे यांनी केले आहे.
महावितरणच्या आटपाडी उपविभागात मागील तीन दिवसांत 76 लाख वसुली करून 400 कनेक्शन तोडली आहेत. या तीन दिवसांत कमर्शियल व औद्योगिक कनेक्शनची वसुली करण्यात आली असून आत्ता घरगुती व इतर कनेक्शन ची वसुली सुरू होणार असल्याची माहिती महावितरणने दिली.