देवराष्टे / प्रतिनिधी
कोरोना संर्सगाच्या प्रतिबंधासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. परंतु दुसरीकडे वीजग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण धडपडत आहे. यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसरात्र फिल्डवर काम करत आहेत. सध्याच्या काळात वीजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरगुती वापरासह शेती व उद्योगधंद्यामध्ये वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.
त्यातच कोरोनाला हरवण्यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोक घरी थांबुन आहेत. तसेच सरकारी व खाजगी क्षेत्रातील लोकांना वर्क फ्राॅम होम देण्यात आले आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याअभावी लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता घरगुती वापराच्या वीजेचा पुरवठा अखंडीत देण्यात येत आहे. याचबरोबर महावितरणकडुन शेतीलाही मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करण्यात येतो.सध्या ऊन्हामुळे शेतीसाठीचा वीजवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचार्याची तारेवरची कसरत सुरू आहे.
महावितरणने लाॅकडाऊनच्या कालावधीतील वीजबिल भरण्यास मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत कोणत्याही ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही. तसेच सध्या मीटररिडींग घेणे, प्रिटींग, थकबाकी वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी बोलताना महावितरणचे अधिकारी म्हणाले महावितरणच्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या वीजमीटरच्या रिडीगची नोंदणी करु शकतात तसेच वीजबील देखील भरु शकतात. सध्या महावितरणकडुन तांत्रिक कामे, वाहिन्या टाकणे, फ्युज घालणे आदी आवश्यक कामाचं करण्यात येत आहेत. कोरोणापासुन बचाव करण्यासाठी मास्क व सॅनिटायझर खरेदीसाठी प्रत्येक कर्मचार्यास महावितरणने 1000 रु. देऊ केले आहेत. तसेच सुरक्षेसंबधीच्या अन्य सूचनाही वेळोवेळी देण्यात येत आहेत.