- तब्बल २५४ शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु
ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील २५४ शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची कामे महावितरणने पूर्णत्वास नेली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने आढावा घेत या योजनेला गती दिल्याने राज्यातील तब्बल १ कोटी १५ लाख शहरी वीजग्राहकांचा वीजपुरवठा आणखी दर्जेदार झाला आहे.
शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत महावितरणने ४४ मंडल अंतर्गत २५४ शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कामे सुरु केली. यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची निवड करण्यात आली. या शहरांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांना अखंडितवयोग्यदाबाचा वीजपुरवठा करणे, नवीन वीजजोडण्या देण्यासाठी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे तसेच वीजहानी कमी करणे व त्याच्या योग्य मोजमापासाठी म्हणजे ऊर्जा अंकेक्षणासाठी ग्राहक, रोहित्र व फिडरला योग्य क्षमतेचे मीटर लावणे आदी कामे करण्यात आली आहे.
गेल्या सव्वा वर्षातील कोरोना काळातील खडतर आव्हानाला सामोरे जात महावितरणनेएकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील २३०० कोटी रुपये खर्चाची कामे पूर्णत्वास आणली आहेत. यामध्ये प्रस्तावित १२० नवीन उपकेंद्रांपैकी ११९ उपकेंद्र कार्यान्वित झाले आहेत तर १०० पैकी १०० उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. नवीन वितरण रोहित्रांचे ४ हजार ९८७ पैकी ४ हजार ९७० कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित सर्वच ४ हजार २०७ रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. उच्च व लघुदाबाच्या ३ हजार ३४७ पैकी ३ हजार ४२ किलोमीटर वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर तब्बल ६ हजार६९४ किलोमीटरच्या भूमिगत वीजवाहिन्या व एरियल बंच केबलचे काम पूर्ण झाले आहे.
सोबतच शहरी भागामध्ये ५ लाख ३० हजार ३४० नवीन वीजजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.