पलूस / प्रतिनिधी
पलूस येथील महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने पलूस शहरातील शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता, शेतीचा विजपुरवठा खंडीत केला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे व स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश येसुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महावितरणच्या कार्यलयातील अधिकाऱ्यांना घेरावा घातला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीचे अधिकारी कोणतेही लेखी आदेश नसताना, मनमानीपणे विज जोडणी तोडण्याचा कारभार करीत आहेत. शेतकऱ्यांना विज तोडणीची पुर्व सुचना न देता, विज पुरवठा खंडीत केला आहे. शेतीची विज बिले वाढीव येत आहेत असा उपस्थित शेतकऱ्यांचा आरोप होता. त्यामुळे अचानक झालेल्या महावितरणच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांच्यात मोठा रोष निर्माण झाला आहे.
महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विज बिल भरण्यास मुदतवाढ न देता, महावितरणकडून सक्तीने विजबिल वसुली केली जात आहे. विज बिल भरले नाही म्हणुन विज कनेक्शन न तोडता, थेट शेतीला विजपुरवठाकरीत असलेला डिपीच बंद केला जात आहे. मिटर रिंडीग व बिलावरील रिंडीगमध्ये तफावत आहे. ती दुरूस्त केल्या शिवाय बिले भरण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कडुन होणारी लुट थांबवावी अशी मागणी स्वाभिमानीचे निलेश येसुगडे यांनी केली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना महावितरणचे अधिकारी म्हेत्रे यांनी बंद केलेले डीपी सुरू करण्याचे आश्वासन दिलेमुळे संतप्त शेतकरी शांत झाले.