जनता दलाचे नेते शरद पाटील यांचा घणाघाती आरोप
सांगली / प्रतिनिधी
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलेली लाखो रुपयांची वीज बिले बोगस असून ती दुरुस्त करून देण्याची मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. तसेच 50% थकबाकी भरून थकबाकी मुक्त होण्याची महावितरणची योजना फसवी आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारी असल्याचा आरोपही शरद पाटील यांनी यावेळी केला. मागणीसाठी जनता दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभा करण्यात येईल. शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता मिरज येथील जनावर बाजारांमध्ये यासंदर्भात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जनता दलातर्फे तयार करण्यात आलेले विज बिल दुरुस्तीचे फॉर्म शेतकऱ्याकडून भरून घेण्यात येणार आहेत. सर्व शेतकऱ्यांचे विज बिल दुरुस्तीचे अर्ज महावितरण कंपनीकडे देण्यात येणार असून वीज बिलाच्या दुरुस्तीसाठी कायदेशीर लढाई बरोबरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्राध्यापक शरद पाटील यांनी यावेळी बोलताना दिला. मिरज येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांनी विज बिलासह उपस्थित राहावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.