नळ पाणीपुरवठा, पथदिव्यांची वीज जोडणी तोडल्याबद्दल महावितरणचा निषेध
प्रतिनिधी / कोल्हापूर
नळपाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ जिह्यातील सरपंचांनी महावितरणच्या ताराबाई पार्क येथील परिमंडल कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले. हातगणंगले तालुक्यातील माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सरपंचांनी हे आंदोलन सुरु केले आहे. मागण्यांचे निवेदन यापूर्वीच महावितरणच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले आहे. अनेक गावांतील सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवून पाठींबा दिला. महावितरणच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, कोल्हापूर जिह्यातील ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना व पथ दिव्यांच्या थकबाकीचे कारण पुढे करून महावितरणकडून पथ दिवे व पाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणारे महावितरणचे पोल, डिपी, हायटेंशन विद्युत यंत्रणेचा कर मिळावा, यासाठी माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल माणगाव ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार कर वसुलीचे आधिकार हे कायद्याने दिले आहेत. 129 नुसार वसुली करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तरीही महावितरणच्या वेगवेगळ्या उपविभागामार्फत ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा व पथ दिव्यांचे वीज कनेक्शन बंद करण्याचा उद्योग सुरू आहे.
याउलट जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीना महावितरणने कोट्यवधी रूपये कराची थकबाकी द्यावी लागते. पथदिव्यांची मागील 31 मार्च 2018 पर्यंतची थकबाकी देखील राज्य शासनाने भरावी. 31 मार्च 2018 नंतर आस्थापित झालेल्या म्हणजे नवीन कनेक्शन झाले असल्यास त्याची बाकी ग्रामपंचायतने भरावी, असा शासन निर्णय झाला आहे. तसेच यापूर्वीही राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीच्या हिस्यातील 14 व्या वित्त आयोगमधील चार हफ्त्यांतून 1 हजार 370 कोटी रुपये महावितरण कंपनीस दिले आहेत. त्याचा देखील महावितरणने अद्याप हिशोब दिलेला नाही. कोणत्या ग्रामपंचायतीचे किती पैसे बाकी होते, कधी पासून होते, याचा काहीही ताळमेळ दिला नाही. तरी देखील महावितरणकडून ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे जिह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा व पथदिव्यांचे कनेक्शन तोडू नये, तोडले असल्यास ते तात्काळ चालू करावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरणच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित
माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या नेतृत्वाखाली जिह्यातील सरपंचांनी महावितरणसमोर सुरु केलेल्या आमरण उपोषणाची गंभीर दखल घेऊन महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकूर कावळे यांनी मगदूम यांच्यासह शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीज देयकांची रक्कम कोणी भरायची ? याबाबत जि.प.चे सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत चर्चा करून सामोपचाराने निर्णय घेतला जाईल. बैठक होईपर्यंत महावितरणकडून वीज जोडणी तोडण्याची कारवाई केली जाणार नाही, असे लेखी पत्र मगदूम यांना दिले. त्यामुळे अमरण उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, जि.प.सदस्य राहूल आवाडे, अर्जुन आबिटकर, प्रवीण यादव, अर्जुन आबिटकर, विजय भोजे, शिवाजी मोरे, यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.