शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
प्रतिनिधी / बेळगाव
बोगस परिपत्रकामुळे रविवारी दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे 15 ते 30 मार्चदरम्यान 15 दिवस महाविद्यालये बंद राहतील, असे खोटे परिपत्रक सोशल मीडियावर फिरत होते. यामुळे याची शहानिशा करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण खात्यातील कर्मचाऱयांची तारांबळ उडाली. अखेर राज्याच्या शिक्षण विभागानेच हे परिपत्रक खोटे असल्याचे जाहीर करताच या प्रकरणावर पडदा पडला.
सोशल मीडियावर एखादी माहिती उपलब्ध होताच त्याची शहानिशा न करताच ते फॉरवर्ड करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एखादी चुकीची माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते, असा प्रकार रविवारी पहायला मिळाला. त्यामुळे कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. अनेकांनी तर महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे, असे स्टेटसही ठेवले होते. त्यामुळे इतकी घाई नेमकी कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील कॉलेजना 15 ते 30 मार्चदरम्यान सुटी देण्यात आली आहे. उर्वरित कार्यालये मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशा आशयाचे परिपत्रक रविवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दरम्यान अनेक परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. शिक्षकांनाही याविषयी अधिक माहिती नसल्याने इतर ठिकाणी फोनाफोनी सुरू झाली. अखेर शिक्षण विभागानेच हे परिपत्रक खोटे असल्याचे जाहीर केले. त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करताना थोडीतरी खबरदारी घेणे जरुरीचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. बोगस आदेशपत्र असल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने सोमवारपासून सर्व सरकारी, अनुदानित महाविद्यालयांना 15 दिवस सुटी जाहीर केल्याचे बोगस आदेशपत्र जारी करण्यात आल्याचे असे स्पष्टीकरण शिक्षण खात्याचे आयुक्त प्रदीप यांनी दिले आहेत. बोगस आदेशपत्र व्हायरल केलेल्यांविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. अशा पद्धतीचेच हे पण बोगस आदेशपत्र आहे. सरकारच्या जुन्या आदेशपत्रामध्ये बदल करून सदर आदेशपत्र व्हायरल करण्यात आले आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. नेहमीप्रमाणे महाविद्यालये सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.