प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना संसर्गामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असणारी राज्यातील पदवी महाविद्यालये मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली आहेत. सध्या अंतिम वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये नियमित सुरू झाली असून मंगळवारी पहिल्या दिवशी मोजकेच विद्यार्थी हजर झाले. दरम्यान, ऑनलाईनद्वारे शिकविण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक अटी व नियम जारी करून त्यांचे पालन करण्याची सक्ती महाविद्यालयांना केली आहे. सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करण्याची सक्ती आहे. मागील तीन दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांनी कोरोना चाचण्या करून घेतल्या. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या चाचण्यांचा अहवाल अद्याप उपलब्ध न झाल्याने ते महाविद्यालयात हजर होऊ शकले नाहीत. सरकारकडून सर्वांसाठी मोफत चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
युजीसीच्या मार्गसूचींचे पालन करण्याची सक्ती असल्याने राज्यातील पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र असणाऱया विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला. बेंगळूरमधील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती. मात्र, उर्वरित जिल्हय़ांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी हजर झाले होते.